Chhatrapati Shahoo Maharaj : Satara ( 1708 to 1749)
छत्रपती शाहू महाराजांनी आपले आजोबा हिंदवी स्वराज्य-संस्थापक
श्रीशिवछत्रपतींचे प्रशासनिक नीतीचे अनेक दंडक बाजूस ठेवले. प्रशासनातील
कोणतेही पद वंशपरंपरेने द्यायचे नाही; कोणाही मंत्र्यास सरंजाम द्यायचा नाही,
हा महत्त्वाचा दंडक ते महाराष्ट्रात आल्यावर खेडच्या लढाईनंतरच त्यांनी
अल्पावधीत वाऱ्यावर सोडला.
यावर टिपणी करताना डॉ. पठाण म्हणतात, “कोणतेही पद वंशपरंपरागत
पद्धतीने द्यायचे नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार त्यांचे नातू
विसरले,... पुढील वाटचालीत वंशपरंपरागत पदे देण्याची पद्धतच शाहू
महाराजांनी स्वीकारल्याने केंद्रीय सत्ता नाममात्र होऊन त्यांच्या पदरचे
मानकरी मात्र सत्तेचे वाटेकरी बनले.”
शिवछत्रपतींपासून महाराणी ताराबाईंपर्यंत सर्व मराठा राज्यकर्त्यांचा
विचार दिल्लीची पातशाही बुडवून तिथे मराठा पातशाही स्थापन करण्याचा
होता. शाहू महाराजांना मोगल पातशाहीविषयी जे प्रेम वाटत होते, ते
अनाकलनीय होते, असे डॉ. पठाण यांना वाटते. आपल्या पित्याच्या निर्दयी
हत्येचे विस्मरण त्यांना व्हावे, हे त्यांच्या मनाचा कमकुवतपणा व मराठा
अस्मितेचे दुर्दैव दर्शविते, असा आपला स्पष्ट अभिप्राय डॉ. पठाणांनी
नोंदविला आहे. तथापि शाहू महाराजांच्या धोरणामुळेच मराठी सत्तेचे
रूपांतर साम्राज्यसत्तेत कसे झाले, याचा सविस्तर आढावाही त्यांनी या
चरित्रग्रंथात घेतला आहे. विशेषत: आजच्या सातारा शहराच्या स्थापनेचे
व त्याच्या उभारणीचे सर्व श्रेय शाहू महाराजांना जाते.
18 व्या शतकातील मराठ्यांच्या इतिहासाच्या जडणघडणीत शाहू
महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा व धोरणाचा फार मोठा वाटा होता. त्यांच्या
काही गोष्टी आपणास पटो वा न पटो, त्यांचे इतिहासातील स्थान मात्र
अबाधित राहाणार आहे.
- डॉ. जयसिंगराव पवार
Chhatrapati Shahoo Maharaj : Satara ( 1708 to 1749) | Dr. Ismail Pathan
छत्रपती शाहू महाराज : सातारा (1708 ते 1749) । डॉ. इस्माईल पठाण
